Wednesday, 12 August 2026

देव सर्वांना बिझी ठेवो!

तो : काय चाललंय?
मी : काही नाही. नेहमीचंच.
तो : कुठं, ऑफिसमध्येय का आत्ता?
मी : हो.
तो : बिझी आहेस ना?
मी : हो.
तो : चांगलंय......
मी : का रे?
तो : आरं, बिझी आहेस म्हणजे खुश आहेस!
मी : हा... म्हणजे बिझी तर आहे...
तो : ऐकून बरं वाटलं. अशीच बिझी राहा...
मी : ..................................
असा भर दुपारचा त्याचा फोन येतो कवातरी...
“आरं, गुरांना खायला नाही. प्यायला पाणी नाही. तुमच्या वस्तीवर तर लय बेक्कार...”
तो जे काही म्हणतो, ते चित्र स्पष्ट दिसतं. त्याला काय सांगावं, कळत नाही. “काय चाललंय?” हा प्रश्न तो जितक्या सहजगत्या विचारतो, तोच प्रश्न त्याला विचारताना खूप अवघडल्यासारखं वाटतं. पण तरीही तो मला आठवणीने ‘अशीच बिझी राहा!’ हे म्हणायला विसरत नाही.
‘बिझी राहा’!...................
असा निरोप ऐकलाय कधी?
मी पहिल्यांदाच ऐकला...
हा निरोप आणि निरोप देणारा महत्त्वाचा आहे.
एकाच वर्गात शिकलेले आम्ही. मी शहरात निघून आलेय अन् तो गावी शेती करतो. इथं मी बिझी आहे म्हणजे ‘हाताला काम आहे’... काम आहे म्हणजे पोटापाण्याची सोय लागली आहे... थोडक्यात, बेसिक गोष्टींशी चाललेला झगडा तरी किमान संपला आहे. याऊलट त्याचं सगळं.
सांगायचा मुद्दा हा की, त्याच्या ‘बिझी राहा!’ म्हणण्यामागे इतका सारा अर्थ दडला आहे.
त्याच्या ‘बिझी राहा!’ वर माझी शांतता ऐकून, “करतो मी परत फोन,” म्हणून तो निघून जातो. अन् सांगायची गरजच नाही की त्याची अशी न संपणारी वणवण सुरूच राहतेय... बारमाही!
का कुणास ठाऊक; पण त्याचं ते ‘बिझी राहा!’ कानातून जातच नाही.
बाकी ते काहीही असो. पण; ‘देव सर्वांना बिझी ठेवो!’
हो की नाही?
 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home