Monday 20 July 2020

कधीकधी कशाचंच काहीच वाटत नाही....

सहज आठवत होते... 

वेळी-अवेळी पाण्याच्या टँकरचा आवाज आला की उठायचो. तेवढं वर्ष जास्तच तापदायक गेलं. पण सवय झालेली. याच्यापेक्षा जास्तीत जास्त वाईट काय घडलं ते आठवत नाही. कधी भूकंप नाही, पूर नाही. जोराचा पाऊस नाही. आणि अगदी मरून जावं इतका दुष्काळ पण नाही. जेवढं जगलो, जसं जगलो त्यात जिव्हारी लागावं असं फार काही नाही. 

खरं तर सगळ्याचीच सवय करून घेतलेली. आठवड्यातून एकदाच भाजी आणायची. किराणा पण तेव्हाच. एकाच पिशवीत. चहा पावडरचा तेव्हा काडी पेटीच्या दोन का तीन पेट्या मावतील एवढा बॉक्स मिळायचा. आठ दिवसाला पुरेल इतका. 

दवाखाना खूप आजारी पडलं तरंच. पालखी, जत्रा आणि उन्हाळ्यातील लग्न सोडली तर नवीन कपडे घालण्याचा संबंध नाही. 

उन्हाळा, दिवाळी सुट्टी सगळी माळावरंच घालवायची. प्रवास नावाची गोष्टच नव्हती. लाल वावरात पाहिजे तेवढं खेळायचं. कालवण नसलं तरी चटणी बरोबर भाकरीचा काला करून खायचं... लय लय दुःख करावं असं काहीच नाही. अगदी कुणाचा मृत्यूही नाही. 

आणि मग कधीतरी शहरात येणं झालं. आज शहरात सगळं  मिळतंय. अंहं .... मिळवलंय. याव्यतिरिक्त आवर्जून नोंदवावं असं काही नाही. 

आईनी ७२चा दुष्काळ सांगितलेला. तिच्या दुःखाचं कधीच काहीच वाटलं नाही. कदाचित मी माझ्या पुढच्यांना कोरोनाबद्द्ल सांगेन. त्यांनाही काही वाटेल असं वाटत नाही. खरं तर काहीच सांगता येत नाही. कधीकधी कशाचंच काहीच वाटत नाही....

No comments:

Post a Comment

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...