Posts

थोडंसं ऊन

गावाचं वेड असं की कुणाचंही गाव आवडतं. लोणंदमधून जोशीवीर मार्गे भुईंज, वाई, महाबळेश्वरकडे जातानाही असंच एक गाव लागतं. गावाचं नाव माहिती नाही, पण सैनिकाचं गाव आहे. देखणं आहे. खूप मोठ्या झाडाभोवती उंचसा पार, हापशी आणि मंदिर. सैनिकाचं का म्हटलं ते कळालंच असेल. गावाच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेली वडाची झाडं. अगदी दूरपर्यंत... त्यांच्या पारंब्या रस्त्याच्या डोक्यावर अर्धगोलाकार आकारात कापलेल्या. त्यामुळं अजूनच देखणा झालेला रस्ता. पोरांच्या भाषेत खुष्कीचा मार्ग! या गावातून बाहेर पडलं की काही अंतरानंतर सगळी शेतंच सुरू होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला. दूरपर्यंत एकही घर नाही की फडफडता सदरा. इतकंच काय, अगदी त्या वावरातनं बुजगावणंही नाही! सडक एकदम अरुंद आणि एकटी. मागं-पुढं सडकंशिवाय कुणीच नाही. अगदी शेळ्या-मेंढ्या फिरून गेल्याचीही चिन्हं नाहीत. या अखंड एकट्या सडकंवर काही काळ उभं राहावंसं वाटतं. काय माहीत, पण कदाचित उन्हाच्या पाऱ्याची भुरळ असावी. वावरं स्वतःतच मग्न असल्यासारखी. डोक्यावर तुरळक भटके ढग... बाकी सगळं आकाशाचंच. एक सलग नजर टाकली तर वावरांच्या छटा बदललेल्या. कुठे काळ...

झाडं आवडतात

झाडं आवडतात.  शहाणी, समजदार वाटतात.  माणसाचेच कुठलेतरी  नातेवाईक असल्यासारखी.  झाडांवर पडलेलं चकाकतं ऊन पाहिलं  की सगळं विसरायला होतं.  स्थळ, काळ, वेळ  काहीही आठवत नाही. पण आजकाल प्रश्न पडतो.  की झाडं पण  दुःखी होत असतील का? जवळची झाडं निघून गेल्यावर...  आणि इथून निघून गेलेली माणसं  कुठं गेली  हे कदाचित झाडांनाच ठाऊक असेल. कधीकधी ही झाडंच निघून गेलेल्या माणसांचा उरलेला अंश वाटतात... अखेरपर्यंत झाडंच त्या दोन्ही माणसांवर सावली धरत राहतात.  #झाडं_आहेत_तोपर्यंत...

...ढग प्रेमळ असतात

Image
  ...ढग प्रेमळ असतात आणि झाडंसुद्धा. #झाडं_आहेत_तोपर्यंत #मुखई

थोडीशी माती, छोटासा पक्षी अन् एखादं झाड

Image
...भाजलेल्या शेंगांचा वास, तिने सोबत आणलेल्या काळ्याभोर मातीसहीत हवेत मिसळला तरी ओळख लागते. झाडाच्या फांद्यामध्ये दडलेला पक्षी ओरडला की कान टवकारतातच. पाऊस दरवर्षी आला तरी आयुष्यभर मनात रुतून बसलेले सगळे ऋतू आठवतात. ...माणसाला ओळखणारं हे सगळं असतं. आपल्याही हृदयात थोडीशी माती, छोटासा पक्षी अन् एखादं झाड असतंच जणू. माणसं विसरतात पण ऋतू विसरत नाहीत. माणसाला जगायला हे जास्त लागतं. बाकी जगण्याची अतीव ओढ कशातच नसते...   #वळीव_२०२६ #शिरोळ_सांगली #माती_झाड_आणि_पक्षी #झाडं_आहेत_तोपर्यंत  

आकाशातलं झाड

Image
... आणि मग चालता चालता "थांब" म्हणालेलं आकाशातलं झाड. #झाडं_आहेत_तोपर्यंत #आसले #वाई #सातारा  

देव सर्वांना बिझी ठेवो!

तो : काय चाललंय? मी : काही नाही. नेहमीचंच. तो : कुठं, ऑफिसमध्येय का आत्ता? मी : हो. तो : बिझी आहेस ना? मी : हो. तो : चांगलंय...... मी : का रे? तो : आरं, बिझी आहेस म्हणजे खुश आहेस! मी : हा... म्हणजे बिझी तर आहे... तो : ऐकून बरं वाटलं. अशीच बिझी राहा... मी : .................................. असा भर दुपारचा त्याचा फोन येतो कवातरी... “आरं, गुरांना खायला नाही. प्यायला पाणी नाही. तुमच्या वस्तीवर तर लय बेक्कार...” तो जे काही म्हणतो, ते चित्र स्पष्ट दिसतं. त्याला काय सांगावं, कळत नाही. “काय चाललंय?” हा प्रश्न तो जितक्या सहजगत्या विचारतो, तोच प्रश्न त्याला विचारताना खूप अवघडल्यासारखं वाटतं. पण तरीही तो मला आठवणीने ‘अशीच बिझी राहा!’ हे म्हणायला विसरत नाही. ‘बिझी राहा’!................... असा निरोप ऐकलाय कधी? मी पहिल्यांदाच ऐकला... हा निरोप आणि निरोप देणारा महत्त्वाचा आहे. एकाच वर्गात शिकलेले आम्ही. मी शहरात निघून आलेय अन् तो गावी शेती करतो. इथं मी बिझी आहे म्हणजे ‘हाताला काम आहे’... काम आहे म्हणजे पोटापाण्याची सोय लागली आहे... थोडक्यात, बेसिक गोष्टींशी चाललेला झगडा तरी किमान संपला आहे. याऊलट त्...

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवाद ‘डायमंड प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या प्रारंभी ऑरवेल यांनी ‘नाईन्टीन एटीफोर’ या त्यांच्या शेवटच्या कादंबरीचं कच्चं लिखाण सुरू केलं. तेव्हा त्यांनी याचं शीर्षक ‘द लास्ट मॅन इन युरोप’ असं द्यायचं ठरवलं होतं. ही कादंबरी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अखेरीस पूर्ण झाली. त्यावेळी ऑरवेल यांनी ‘अठ्ठेचाळीस’ या आकड्याची अदलाबदल करून त्या कादंबरीला ‘नाईन्टीन एटीफोर’ असं नाव दिलं. हा झाला कादंबरीच्या नावामागचा इतिहास.  हुकुमशाही टोकाला गेली तर तिचे पडसाद कशाप्रकारे उमटू शकतात याचा वेध या कादंबरीतून घेण्यात आला आहे. भविष्यकाळाचं भेसूर चित्र रंगवणारी ही कादंबरी एवढी प्रभावशाली ठरली की सर्वांना एकोणीसशे चौर्याऐंशी साली या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं खरोखर घडेल असं वाटू लागलं होतं. अर्थात प्रत्यक्षात एकोणीसशे चौर्याऐंशी सालामध्ये या कादंबरीत लिहिल्याप्रमाणं काहीही घडलं नसलं तरीही आजही ही कादंबरी समकालीन वाटावी अशी आहे. ऑरवेल या...