थोडंसं ऊन
गावाचं वेड असं की कुणाचंही गाव आवडतं. लोणंदमधून जोशीवीर मार्गे भुईंज, वाई, महाबळेश्वरकडे जातानाही असंच एक गाव लागतं. गावाचं नाव माहिती नाही, पण सैनिकाचं गाव आहे. देखणं आहे. खूप मोठ्या झाडाभोवती उंचसा पार, हापशी आणि मंदिर. सैनिकाचं का म्हटलं ते कळालंच असेल. गावाच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेली वडाची झाडं. अगदी दूरपर्यंत... त्यांच्या पारंब्या रस्त्याच्या डोक्यावर अर्धगोलाकार आकारात कापलेल्या. त्यामुळं अजूनच देखणा झालेला रस्ता. पोरांच्या भाषेत खुष्कीचा मार्ग! या गावातून बाहेर पडलं की काही अंतरानंतर सगळी शेतंच सुरू होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला. दूरपर्यंत एकही घर नाही की फडफडता सदरा. इतकंच काय, अगदी त्या वावरातनं बुजगावणंही नाही! सडक एकदम अरुंद आणि एकटी. मागं-पुढं सडकंशिवाय कुणीच नाही. अगदी शेळ्या-मेंढ्या फिरून गेल्याचीही चिन्हं नाहीत. या अखंड एकट्या सडकंवर काही काळ उभं राहावंसं वाटतं. काय माहीत, पण कदाचित उन्हाच्या पाऱ्याची भुरळ असावी. वावरं स्वतःतच मग्न असल्यासारखी. डोक्यावर तुरळक भटके ढग... बाकी सगळं आकाशाचंच. एक सलग नजर टाकली तर वावरांच्या छटा बदललेल्या. कुठे काळ...